गुणवंत आदिवासी विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव
पाच वर्षांत दीड लाख आदिवासी मुलांना
नामांकित शाळेत शिक्षण देऊन आधुनिक पिढी घडविणार
---मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे दि ९: प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवणारे विद्यार्थी आदिवासी समाजात आहेत. त्यांचे आयआयटी, इंजिनिअर, डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे आदिवासी विभागाने निश्चित केले असून येत्या ५ वर्षांत दीड लाख आदिवासी मुलांना राज्यातील नामांकित शाळांमधून शिक्षण देऊन उद्याची ज्ञानी आणि आधुनिक पिढी आम्ही घडविणार आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त येथील गडकरी रंगायतनमध्ये भारतरत्न डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहारयोजनेचा विस्तार आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास आदिवासी मंत्री श्री विष्णू सवरा, पालकमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे, आदिवासी राज्य मंत्री श्री राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव अत्राम, महापौर संजय मोरे, अनुसूचित जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष रुपेश म्हात्रे, युनिसेफच्या राज्य प्रमुख श्रीमती राजेश्वरी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले, वीर बाबुराव शेडमाके या चंद्रपूरच्याआदिवासी तरुणाने वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी इंग्रजाविरुद्ध आवाज उठविला. तर इकडे भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजाना सळो कि पळो करून सोडले. आजच्या दिवशी चले जाव चळवळीचे स्मरण करीत असतांना या दोघांनी केलेले संघर्षाचे योगदान कायम लक्षात राहील.
आधुनिकतेचा स्वीकार करावा
आदिवासींनी मागास राहता कामा नये , त्यांना मुख्य प्रवाहात आणायचे असेल तर चांगल्या शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ध्यानात ठेऊन या समाजाने आधुनिकतेचा स्वीकार करावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. एकीकडे आम्ही आश्रमशाळा चांगल्या करणार आहोत तर दुसरीकडे आदिवासी मुलांना नामांकित शाळांमध्ये शिकवण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि गेल्या वर्षी २५ हजार मुलांना प्रवेश मिळवून दिला . या वर्षी त्यापेक्षा जास्त मुलांना आम्ही चांगल्या शाळांमधून शिकविणार आहोत.
२०१९ पर्यंत प्रत्येक आदिवासी कुटुंबाकडे स्वत:चे घर असेल यादृष्टीने देखील आम्ही नियोजन केले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
हेल्थ इंडिकेटर सुधारले
आदिवासी महिलांमध्ये योग्य आहाराअभावी कुपोषण आढळते. त्यामुळे त्यांची मुलेही कमजोर होतात . शारीरिक वाढ बरोबर नसेल तर त्याचा परिणाम बौद्धिक वाढीवर होतोच. मध्यंतरी आम्ही उचललेल्या काही पावलांमुळे ही परिस्थिती सुधारत असून हेल्थ इंडिकेटर चांगले आले आहेत मात्र त्यात अधिक सुधारणा करण्यासाठी आम्ही अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा विस्तार केला आहे आणि आता अगदी बाळंत झाल्यावर ६ महिन्यापर्यंत आम्ही त्या मातेला पोषक आहार देण्याचे सुरु केले आहे.
उद्याच्या पिढीसाठी केलेली गुंतवणूक
या विभागातील १० ते १५ वर्षांपूर्वीचे काम ज्या पद्धतीने चालत होते त्यमुळे अपेक्षित परिणाम साध्य होता नव्हता मात्र आता आम्ही संगणक, इन्टरनेटच्या माध्यमातून रिअल टाईम नियंत्रण मिळवून सर्व व्यवस्था सुधारत आहोत. यापुढे पुरवठादार नव्हे तर आदिवासी विद्यार्थी, माता यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेतले जातील, तशा एसओपी आम्ही विकसित करीत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की आदिवासी, ग्रामविकास विभाग हे महसूल न देणारे विभाग असले तरी याठिकाणी केलेला खर्च ही उद्याच्या पिढीसाठी केलेली गुंतवणूक आहे असे मी समजतो.
वसतीगृहाबाहेरील विद्यार्थ्यांचीही सोय करणार
शासनाने आदिवासी,वनवासी गावांचा विकास करण्यासाठी पेसातर्फे 5% रक्कम ग्रामपंचायतीना देण्याचा निर्णय घेतल्यामुळे या गावांचा विकास होवू लागल्याची चित्रे आता दिसू लागलग आहे असे सांगून आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा म्हणाले की, यावर्षी स्पर्धेत टिकण्यासाठी 25 हजार विद्यार्थ्यांना नामांकीत शाळेत प्रवेश देवून त्याचा खर्च विभाग करणार आहे.आदिवासी संस्कृती टिकविण्यासाठी वारली हाट योजना मनोर या गावात राबविण्यात येणार आहे. राज्यातील वसतिगृहांची कमी संख्या लक्षात घेऊन वसतीगृहाबाहेर राहणा-या विद्यार्थ्यांची राहण्याची व भोजनाची सोय करण्यात येणार आहे. तसेच या विद्यार्थ्यांना देशातच नाहीतर परदेशात शिक्षणासाठी योजना आखली जात आहे. तसेच आदिवासी खेळाडूंना क्रीडापटूंसाठी देण्यात येणारे २५ गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्मार्ट अंगणवाडी योजना
आज आदिवासी विकास विभागाने सुरु केलेल्या योजनांमध्ये माझ्या विभागाचीही महत्वाची भूमिका असून अंगणवाडी ही बाळ आणि आई यांची यशोदा माता आहे असे सांगून महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की,अंगणवाडी ही स्मार्ट योजना अंगणवाडी शासन राबविणार असून त्यामुळे अंगणवाडीतर्फे देण्यात येणा-या चौरस आहाराला ख-या अर्थाने महत्व प्राप्त होणार आहे. या चौरस आहारामुळे बाळ आणि माता यांचे संगोपन व्यवस्थित होऊन भावी पिढी सशक्त घडू शकेल.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक
आपल्या भाषणात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,1995 पासून आदिवासी समाजाला मूळ समाजात स्थान मिळावे म्हणून 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो . शासन आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी १७०० कोटी रुपये खर्च करते याचाच अर्थ विद्यार्थ्यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी ही गुंतवणूक केली जात आहे. हे विद्यार्थी स्पर्धेत उतरुन समाजाचा एक घटक व्हावा या हेतूने शासनाचे काम चालू असून राज्यात कुपोषित माता आणि बालक राहणार नाही यासाठी शासनाने आदिवासी आणि वनवासींसाठी ही योजना आखलेली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
यावेळी इयत्ता 10 वी परिक्षेमध्ये पहिल्या आलेल्या विजया धूम या मुलीचा आणि विश्राम वागदान या मुलाचा 45 हजार रुपये देवून गौरव करण्यात आला तर भावना राठोड आणि अजय गायकवाड यांना प्रत्येकी 35 हजार तर जिस-या आलेल्या रोहिणी बुंबाडे आणि तानाजी गावीत यांना 25 हजार रुपयाचे रोख पारितोषिक देण्यात आले.
इयत्ता 12 मध्ये पहिल्या आलेल्या वैशाली गिरमे आणि चिरावू नाईक यांना 45 हजार रेणूका भोईर आणि सुरेश कवटे यांना 35 हजार आणि मिनल मडावी व गणपत वाघमारे यांना 25 हजार रोख पारितोषिक देण्यात आले. आकश तारे,भारती चौधरी,हेमंत सारा यांचा आयआयटी प्रवेशासाठी निवड झाल्याबद्धल सत्कार करण्यात आला. तसेच युपीएससी मध्ये महसूल अधिकारी म्हणून निवड झालेल्या अजय खर्डे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
व्हिडीओ कॉन्फरन्सने शुभारंभ
आजच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सने भिवंडी तालुक्यातील पाये या गावात अमृत आहार योजनेच्या विस्तारिकरण व टप्पा-2 चा शुभारंभ केला व या गावातील सरपंच आणि आंगणवाडी अधिका-यांशी संवाद साधला. 13 हजार 500 अंगणवाडयात पहिल्या टप्पयामध्ये ही योजना राबविली गेली. आता दुस राटप्पा सुरु होत असून गरोदर मतांना आणि 6 महिने ते 7 वर्ष वय असणा-या बालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे असे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी सांगितले.शेवटी आदिवासी विकास आयुक्त राजीव जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.