Saturday 1 July 2017


जल, जंगल, जमिनीचे संवर्धनावर शासनाचा भर

मुख्यमंत्री फडणवीस यांचा जनसेवकांशी प्रेरणादायी संवाद

नवी मुंबई, दि.1- राज्य शासनाने काम करतांना ‘जल जमीन आणि जंगल’ यांच्या संवर्धनावर भर दिला आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवून पाणलोट क्षेत्राचे पुनरुज्जीवन करणे, 50 कोटी वृक्ष लागवड  करुन सध्या 21 टक्क्यांवर असलेले वृक्षाच्छादन 33 टक्क्यांवर नेणे तसेच गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शिवार हे अभियान राबवून वाहून जाणारी माती अडविणे या तीन प्रमुख योजनांवर शासन काम करीत आहे. ज्यामुळे आपण आपल्या नैसर्गिक स्त्रोतांचे पुनरुज्जीवन करु शकू, असा विश्वास मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

 ऐरोली येथे अनुलोम  संस्थेच्या  राज्यस्तरीय अनुलोम संगम कार्यक्रमात राज्यभरातून आलेल्या जनसेवकांशी श्री. फडणवीस यांनी आज संवाद साधला. ऐरोली सेक्टर 17 मधील महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात  अनुलोम जनसेवकांचे दोन दिवसीय प्रशिक्षण सुरु आहे. यावेळी अनुलोमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल वझे, मुख्य माहिती अधिकारी स्वानंद ओक, विजय पुराणिक तसेच कोकण विभागीय आयुक्त जगदिश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक प्रशासन अजय अंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री. फडणवीस यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जनसेवकांचा सत्कार करण्यात आला. अनुलोम तर्फे तयार करण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांच्या माहिती पुस्तिकेचे व लाभार्थी आभार पत्र स्टिकरचे विमोचनही करण्यात आले.

 यावेळी बोलतांना श्री. फडणवीस म्हणाले की, शासन जनतेसाठी अनेक प्रकारच्या योजना बनवतं परंतू त्या योजना जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या व्यवस्थेतील दोष दुर करुन ती अधिक प्रभावी पणे  जनतेपर्यंत नेण्यासाठी अनुलोम सारख्या सकारात्मक विचारांनी कार्य करणाऱ्या संघटनेचे महत्व खूप आहे. म्हणूनच अनुलोमच्या जनसेवकांनी शासन आणि जनता यांच्यातील दुवा व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

            श्री. फडणवीस म्हणाले की, सकारात्मक विचारांनी  शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणारी अनुलोम ही देशातील एकमेव संस्था आहे. अराजकीय विचारांनी हे काम सेवा भावनेने करणे हे महत्त्वाचे आहे.  म्हणूनच अनुलोमच्या जनसेवकांनी शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  ते म्हणाले की, कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असूनही अदृश्य असते.

 कोणतेही काम करतांना त्या कामामागील प्रेरणा काय आहे हे ओळखणे महत्त्वाचे आहे. शासकीय योजना राबविणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये ही प्रेरणा महत्त्वाचे काम करते.  कुणाच्याही जीवनात सकारात्मक परिवर्तन करणे ही असेल तर ते अधिकारी उत्तम काम करतात. काम करण्यातली सामाजिक बांधिलकी ही वेगळ्या प्रेरणेने येत नाही. त्यामुळे ही प्रेरणा निर्माण करण्यातली दरी भरुन काढण्याचे काम अनुलोम मार्फत व्हावे, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, सामाजिक बांधीलकीची प्रेरणा हीच सकारात्मक परिवर्तन घडवू शकते. यासाठी त्यांनी गॅस सबसिडी सोडण्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी जनतेला केलेल्या आवाहनाचा दाखला दिला.  त्यामुळे सबसिडी सोडणाऱ्या वर्गाला प्रेरणा मिळाली. आणि अनेकांना गॅस कनेक्शनही मिळाले.

 क्षेत्र कोणतेही असो तेथे काम करणारा कार्यकर्ता हा ‘लीडर’ असतो.  अशा सेवाभावी क्षेत्रात काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आज आहे. काम केल्यानंतर कामाबद्दल होणाऱ्या प्रशंसेने अहंकाराचा लवलेषही होऊ देऊ नका , अशी सुचनाही त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केली.

राज्यात नुकत्याच जाहीर झालेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत बोलतांना ते म्हणाले की, ही योजना आखतांना शेतकऱ्यालाच त्याचा फायदा व्हावा, असेच शासनाचे धोरण आहे. अनुलोम च्या कार्यकर्त्यांनी या योजना जनतेपर्यंत पोहोचवाव्या, असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालक स्वानंद ओक यांनी केले. यावेळी राज्यभरातील अनुलोम जनसेवक उपस्थित होते.


ऐरोली येथे वृक्षारोपणाच्या राज्यस्तरीय महामोहिमेचा शुभारंभ
जल, जंगल आणि जमिनीची अवस्था सुधारण्यासाठी राज्य शासनाची ठोस पाऊले;
नदी बचाव मोहिमेत राज्य सहभागी होणार
                                                        – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे दि १: जल, जंगल आणि जमीन या तीनही पर्यावरणाच्या दृष्टीने आणि एकूणच आपल्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम करणाऱ्या बाबींसाठी राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊले उचलली असून यामुळे येणाऱ्या काही वर्षांत पर्यावरणाचे फायदे दिसून येण्यास सुरुवात होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी येथे सांगितले. ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ आज त्यांच्या उपस्थितीत ऐरोली येथे झाला यावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री एकनाथ शिंदे, सदगुरु जग्गी वासुदेवजी, आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम,आदींची उपस्थिती होती.
ऐरोली सेक्टर १० येथे कोस्टल एंड मरीन बायोडायव्हर्सिटी सेंटरच्या प्रांगणात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ताम्हण या राज्य पुष्पाचे रोपटे, तर नितीन गडकरी व एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पिंपळ, तर सुधीर मूनगंटीवार आणि सद्गुरू जग्गी वासुदेवजी यांच्या हस्ते कडुलिंबाचे रोपटे लावण्यात आले. यावेळी मुसळधार पाउस सुरु असतांना देखील उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, नागरिक यांचा रोपे लावण्याचा उत्साह कमी झाला नव्हता. 
 
नदी बचाव मोहिमेतही सहभागी होणार
जग्गी वासुदेवजी यांनी नदी बचाव मोहिमेची देशव्यापी सुरुवात केली असून महाराष्ट्र देखील या मोहिमेत आघाडीवर असेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिली. आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, सुधीरभाऊंनी झाडे लावण्याचा जो निर्धार केला आहे त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रातील वनांचे आच्छादन ३३ टक्के झाल्याशिवाय राहणार नाही. मागील वर्षी २ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य असतांना अडीच कोटी वृक्ष लागवड करण्यात आली.         वनविभागाच्या वृक्षारोपणाकडे पूर्वी जुन्याच खड्यांमध्ये नवी रोपे लावतात असे उपरोधाने म्हटले जायचे, पण वनविभागाने कात टाकली असून नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. खड्डे खोद्ण्यापासून ते रोपे लावणे आणि ते जगविणे या सर्वांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नियंत्रण ठेवण्यात येते. प्रत्येक रोपांचे जिओ टॅगिंग केले जात आहे.
जलयुक्त शिवार योजनेतून अनेक नाहीसे झालेले स्त्रोत जिवंत करण्याचे काम सुरु आहे तसेच गाळ्मुक्त धारण आणि गाळयुक्त शिवार या योजनेत जमिनीचा कस कसा वाढेल आणि ती सुपीक कशी होईल असा प्रयत्न आम्ही करीत आहोत असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

अनुकरण देशभर व्हावे
याप्रसंगी बोलतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वन विभागाच्या कामाची प्रशंसा केली. ते म्हणाले की, अतिशय कमी कालावधीत नियोजनबध्द पद्धतीने हाती घेतलेल्या या मोहिमेचे अनुकरण देशभर इतर राज्यांनी देखील करावे.देशभरातील राष्ट्रीय महामार्गालगत देखील आम्ही मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याचे नियोजन केले आहे असे ते म्हणाले.
आगामी काळात पर्यावरणपूरक इंधनावर आम्ही भर देणार असून नागपुरात आम्ही बायो इथेनॉलवर चालणारया ५५ बसेस सुरु केल्या आहेत. देशात अगरबत्तीच्या व्यवसायासाठी ४० हजार कोटीचे लाकूड आयात होत असून ४ हजार कोटीच्या काड्या आयात होतात, पण आता गडचिरोली येथे सुधीरभाऊनी अगरबत्ती उत्पादनासाठी तेथीलच जंगलातील बांबू व इतर लाकूड याचा उपयोग करुन क्लस्टर सुरु केले आहे त्याचा निश्चितच फायदा स्थानिक उद्योगाला होईल. बांबूचा देखील चांगला उपयोग आपण करून घेऊ शकतो असे ते म्हणाले.
  जग्गी वासुदेवजी यांनी देखील या मोहिमेची प्रशंसा करून आपल्या नदी बचाव मोहिमेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.

राज्य ३३ टक्के हरित करणारच
प्रारंभी वनमंत्री सुधीर मूनगंटीवार यांनी आपल्या प्रास्ताविकात पुढील तीन वर्षांत वन विभागाच्या माध्यमातून ५० कोटी झाडे कोणत्याही परिस्थितीत लावणार असे सांगून या चालू सप्ताहात ४ कोटींपेक्षा जास्त रोपे लावूत अशी आशा व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्या राज्यात २० टक्यांपेक्षा देखील कमी हरित क्षेत्र आहे. पण या मोहिमेनंतर हे हरित क्षेत्र वाढून ३३ टक्के होणारच. ऐरोली येथील हा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी दृष्टिहीन शाळकरी मुलांनी उत्साहात रोपे लावली त्याचा उल्लेखही त्यांनी केला. १६ कोटी ६० लाख रोपटी आत्ता नर्सरीत तयार आहेत असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जग्गी वासुदेवजी यांच्या ईशा फौन्डेशन समवेत वृक्षारोपणाचा करार करण्यात आला. विश्वस्त कृष्णा अरुप, सामाजिक वनीकरणचे प्रधान मुख्य वन संरक्षक अनुराग चौधरी यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

संत तुकाराम वनग्राम पुरस्कार प्रदान
याप्रसंगी सावनेर तालुक्यातील सोनापूर गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला १० लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार देण्यात आला तर ५ लाख रुपयांचा द्वितीय पुरस्कार विभागून निलंगा तालुक्यातील लांबोटा आणि सिधुदुर्ग जिल्ह्यातील पवनपार संयुक्त वन व्यवस्थापन समितीला देण्यात आला. ३ लाख रुपयांचा तृतीय पुरस्कार विभागून गोंदिया जिल्ह्यातील नवाटोला आणि भोकर तालुक्यातील बेंबर संयुक्त वन व्यवस्थापन समितीला देण्यात आला. १ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून हिंगोलीतील आंगणवाडा संयुक्त वन व्यवस्थापन समितीला देण्यात आले.
माहितीपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन
याप्रसंगी महाराष्ट्रातील सागरी जैवविविधता –एक परिचय हे आयझेक किहीमकर व सुप्रिया झुनझुनवाला लिखीत पुस्तक, कोल्हापूर वनवृत्तातील रेस्क्यू ऑपरेशन तसेच अपर प्रधान मुख्य वन संरक्षक एन वासुदेवन यांनी लिहिलेल्या हिस्ट्री ऑफ मॅन्ग्रोव्हज पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.

बायकर्स रॅली
यावेळी मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते बायकर्स रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. २२ बायकर्स हे वृक्षारोपणाचा संदेश देत राज्यातील जिल्ह्यांतून फिरणार असून ७ तारखेस ठाणे येथे समारोप होणार आहे.
आजच्या मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक, गणपत गायकवाड, मुख्य सचिव सुमित मल्लिक, श्रीमती सपना मुनगंटीवार, महापौर सुधाकर सोनवणे आदींची उपस्थिती होती.
वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी यावेळी आभार मानले.