Saturday 8 April 2017

वाहतूक कोंडी कमी करणाऱ्या माणकोली उड्डाणपुलाच्या ४ मार्गिका वाहतुकीस खुल्या

भिवंडी परिसरात देशातील एक उत्कृष्ट इकोनॉमिक कॉरीडॉर तयार करणार – मुख्यमंत्री

ठाणे दि ८: भिवंडी परिसरात देशातील एक उत्कृष्ट इकोनॉमिक कॉरीडॉर तयार करण्याचे नियोजन एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात आले असून याठिकाणी अद्ययावत लॉजीस्टिक पार्क, दळणवळणाच्या सोयी सुविधा असतील तसेच १० लाख लोकांना रोजगारही मिळेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भिवंडी माणकोली येथे सांगितले. ते आज माणकोली नाका येथील उड्डाणपुलाच्या उजव्या मार्गीकेचे उद्घाटन करतांना बोलत होते. या उड्डाणपुलामुळे ठाणे नाशिक मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे. उड्डाणपुलाच्या सुरुवातीला बांधलेली फीत कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून हा पूल वाहतुकीस खुला करण्यात आला.
भिवंडी परिसराच्या सर्वांगीण कायापालटाचे नियोजन स्पष्ट करतांना मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांना रोजगारासाठी प्राधान्य देण्यात येईल असे टाळ्यांच्या कडकडाटात जाहीर केले.
भिवंडीच्या विकासाचा आराखडा पूर्वीच्या सरकारच्या काळात तसाच पडून होता. आम्ही सत्तेवर आल्यानंतर त्याला जोरदार गती दिली आणि काही महिन्यातच बदल दिसू लागला. याठिकाणी ९८५ कोटींचे विविध विकास कामांच्या निविदा काढण्यात आल्या असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या भागातील ६० गावांमध्ये देशातील एक उत्तम लॉजीस्टिक पार्क उभारण्यात येईल. याठिकाणी शाळा, दवाखाने, वाहतुकीच्या सोयी , इतर आवश्यक पायाभूत सुविधा असतील. संपूर्ण देशाच्या लॉजीस्टिकचे भिवंडी हे मुख्य केंद्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय सल्लागार नेमून गावठाणांचा आदर्शविकास करणे, ग्रामस्थांना उत्तम मोबदला देऊन त्यासाठीची जमीन घेणे या गोष्टी तातडीने सुरु करण्याचे निर्देशच त्यांनी एमएमआरडीएचे आयुक्त युपीएस मदान यांना दिले. यासाठी कुठल्याही प्रकारे निधी कामू पडू दिला जाणार नाही असेही त्यांनी आश्वस्त केले.

एकात्मिक आणि चक्राकार वाहतूक व्यवस्था

केवळ मुंबईच नव्हे तर मुंबई आणि परिसरातील वाहतुकीच्या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन आम्ही मेट्रोला प्राधान्य द्यावयाचे ठरविले असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की गेल्या १० वर्षात १० किमी मेट्रोचे कामही झाले नव्हते ते आम्ही २ वर्षांत प्रत्यक्ष १२० किमीचे काम सुरूही झाले आहे. ठाणे-कल्याण-भिवंडी भागात ५५९ कोटींचे ५ उड्डाणपूल बनविण्यात येत आहेत . नजीकच्या काळात वंजारपट्टी, राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिर, ठाणे-भिवंडी, माणकोली- मोटा गाव अशा या वाहतूक प्रकल्पांमुळे या भागातील दळणवळण सुरळीत होऊन वाहतूकही वेगवान होईल.
मेट्रोमुळे कसा फरक पडतोय हे स्पष्ट करतांना मुख्यमंत्री म्हणाले की, २ कोटी मोठ्या झाडांमुळे जितके कार्बन फूट प्रिंट कमी होतील तितके कार्बन फूट प्रिंट मेट्रोच्या मार्गांमुळे कमी होतील त्यामुळे पर्य्वारणाला पूरक अशी ही वाहतूक प्रणाली एकात्मिक रीतीने विकसित करण्याचे नियोजन मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मुंबई- ठाणे-कल्याण-भिवंडी- भाईंदर अशी एकात्मिक आणि सर्क्युलर वाहतूक व्यवस्था निर्माण केली जाईल, त्यामुळे एमएमआरमधली सगळी छोटी मोठी शहरे जोडली जातील. यासाठी दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनला सर्वेक्षणाचे काम दिले आहे.

कामे वेगवान पद्धतीने व्हावीत

आपल्या भाषणात एक खुसखुशीत टिपणी करतांना मुख्यमंत्री अधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले की, आमच्याकडे आता पुढची दोन अडीच वर्षे आहेत त्यामुळे आमची सर्व कामे आम्हाला त्यात आटोपायची आहेत. आमच्या दृष्टीने वेगाला प्राधान्य आहे. तुम्ही निवृत्तीपर्यंत इथे राहाल पण आम्हाला जनतेला कामे दाखवायची आहेत.

वर्सोवा पुलासाठीही बैठक घ्या- पालकमंत्री

प्रारंभी पालकमंत्री एकनाथ शिंदे , खासदार कपिल पाटील यांनी भाषणे केली. पालकमंत्री म्हणाले की, वर्सोवा पुलाच्या बाबतीत देखील मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलावून राष्ट्रीय महामार्गासह सर्व संबंधिताना निर्देश द्यावेत म्हणजे काम वेळेत पूर्ण होऊन वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सुटेल. तळोजा पर्यंत आलेली मेट्रो कल्याणपर्यंत आणावी अशी सूचनाही त्यांनी केली.
खासदार कपिल पाटील म्हणाले की, या क्षेत्रातील ३४ गावांमध्ये पिण्याच्या पण्याची समस्या सुटणे गरजेचे आहे. अजूनही या ठिकाणी केवळ ८ एमएलडी पाणी पुरविले जाते. भिवंडी हे नवी मुंबईसारखे नियोजनबध्द शहर व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.  आयुक्त मदान यांनी या पुलांमुळे वाहतुकीवरील ताण कसा दूर होणार आहे ते सांगितले.
 राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार शांताराम मोरे, किसान कथोरे, महेश चौगुले, गणपत गायकवाड, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, भिवंडी पालिका आयुक्त योगेश म्हसे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

असा आहे हा उड्डाणपूल

आज उद्घाटन झालेल्या उड्डाणपुलाच्या ४ मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. याची लांबी ६५०.३३ मीटर इतकी असून उर्वरित ४ मार्गिकांचे काम सुरु आहे. हा उड्डाणपूल माणकोली नाक्यावर असून दुसरा पूल भिवंडी कल्याण जंक्शन येथे असेल. सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चरने याचे बांधकाम केले आहे. दोन्ही उद्दन्पुलन्चा खर्च सुमारे १२१ कोटी इतका असेल. या मार्गिका खुल्या केल्यामुळे माणकोली नाका येथे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी दूर होईल. पुलाचे बांधकाम करतांना स्टेमच्या पाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईन्स, बीपीसीएलच्या लाईन्स तसेच आसपासची दुकाने व इतर बाबींमुळे पुलाचे काम मध्यंतरीच्या काळात रखडले होते अशी माहिती यावेळी देण्यात आली.


No comments:

Post a Comment